Saturday, February 13, 2016




वाहन चालविताना होतोय मोबाईलचा वापर
जत,(बातमीदार): चालत्या वाहनांमध्ये बस व खासगी वाहनचालक भ्रमणध्वनीवर बोलत असल्याने प्रवाशांची व पादचार्‍यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या प्रकारामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. राज्य परिवहन महामंडळाचे बस चालक व वाहकांना कर्तव्यावर असताना मोबाईल वापरण्यावर बंदी घातली आहे. इतरही वाहनधारकांना वाहन चालविताना मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र या बंदीचा सर्वत्र फज्जा उडाल्याने दिसून येत आहे. आधुनिक युगामुळे जवळपास आता प्रत्येकाकडेच मोबाईल आला आहे. त्यात बसचालक, वाहकही समाविष्ट आहेत. वाहनधारकांना मोबाईल काळ ठरू शकतो. सोबतच वाहनातील प्रवासांच्या जिवालाही धोका पोहचू शकते. जाणारे विद्यार्थीसुद्धा मुलीसमोर फ्लॅश मारण्यासाठी कानाला मोबाईल लावून दुचाकी चालवत असतात. यातून एखादा पादचार्‍याला धडक लागून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडे आता वाहतूक पोलिसांसाठी लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बहुतांश वाहनधारक वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण साधताना दिसून येतात. दुचाकीधारक तर सर्रास मोबाईलचा वापर करीत वाहन पुढे दामटतात. मान तिरपी करून ते इतरांशी संभाषण साधतात. इतर वाहनधारकही वाहन चालविताना संभाषण करतात. गजबजलेली वस्ती, चौक आदी ठिकाणी याला पायबंद घालण्याची गरज आहे.
परीक्षेचे वाहू लागले वारे
जत,(बातमीदार): नव्या वर्षाच्या आगमनासोबतच स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक दिसू लागला. बहुतांश शाळांची स्नेहसंमेलन जानेवारीत पार पडली. सर्वच शाळेत विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, विविध स्पर्धांची रेलचेल झाली. मात्र फेब्रुवारी महिन्यात सर्वच शाळामध्ये परीक्षांचे वारे वाहू लागले आहे.
शाळांतर्गत घटक चाचणी, सराव परीक्षा पार पडल्या. आता १८ फेब्रुवारीपासून बारावीची तर नंतर १ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरु होणार आहे. त्यासाठी परीक्षा केंद्राची निवड करण्यात आली आहे. बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनाला वळण देणारी परीक्षा असते. बारावीच्या तोंडी व प्रात्याक्षिक परीक्षा सुरु झाल्या आहेत. नियमित व खाजगी विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षा देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
आता दहावीच्या तोंडी प्रॅक्टीकल परीक्षा सुरु आहेत. विद्यार्थ्यांकडून गैरमार्गाशी लढा विषयांतर्गत परीक्षेत केंद्राना नागरिकांचा उपद्रव होणार नाही. यासाठी केंद्रस्तरावर दक्षता समिती स्थापन करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. 
परीक्षेला विद्यार्थ्यांसह पालकही काळजीने सामोरे जातात. आता शाळा, महाविद्यालयात परीक्षा सुरु झाल्यामुळे विद्यार्थीव पालक अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करीत आहे. वर्षभर पुस्तकात डोके घालून राहिलेल्या विद्यार्थ्यांचा हे कसोटीचे दिवस आहेत.

No comments:

Post a Comment