Monday, February 8, 2016

शेततळ्यांना हवी मदतीची ओंजळ
जत,(बातमीदार):गेल्या दोन वर्षांत पावसाने हुलकावणी दिल्यामुळे अन्नधान्य उत्पादनात कमालीची घट आली आहे. आत्तापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करून अंतिम टप्प्यातील द्राक्ष व डाळिंब बागा बहाद्दर शेतकर्‍यांनी जगवल्या आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात व प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईपर्यंत फळबागांना जीवदान देण्याकरिता शेततळी भरण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा फलोत्पादक शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. 
पावसाच्या हुलकावणीमुळे सन २0१४-१५ व सन २0१५-१६मध्ये तालुक्यातील अन्नधान्याच्या उत्पादनात कमालीची घट आली. खरिपात येणारी बाजरी, मूग, सूर्यफूल, तूर, मटकी, हुलगा; तर रब्बीमधील ज्वारी, करडई, गहू, हरभरा या पिकांना चांगलाच फटका बसला.
तालुक्याच्या उमदी,उटगी,बोर्गी, कुंभारी,शेगाव उसाचे मोठे क्षेत्र आहे. सद्य:स्थितीत ऊसतोडणीचा हंगाम सुरू आहे. खोडवा जोपासणीकडे शेतकर्‍यांच्या कल आहे. सध्या या भागात तीव्र  पाणी टंचाई आहे.
पिके जगवणे, जनावरांचा चारा यांबाबत बिकट वाट वहिवाट, अशी स्थिती होणार आहे. द्राक्ष व डाळिंबाचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्यामुळे सद्य:स्थितीत या पिकांना पाण्याची तितकीशी आवश्यकता नाही. परंतु, एक महिन्यानंतर खरड छाटणीनंतर द्राक्षांना, आंबे बहराच्या डाळिंबाला पाण्याची नितांत गरज भासणार आहे. 
ज्या भागात फळ लागवडीखालील क्षेत्र जास्त आहे, त्या भागातील शेतकर्‍यांनी आपल्या रानात शेततळी खोदली आहेत. अनुदानाची वाट न पाहता, पिकासाठी पाणी साठविण्याचे साधन निर्माण करून ठेवले आहे. हेच साधन उन्हाळ्यात व प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईपर्यंत पाणी साठविण्यासाठी उपयोगी पडणार आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी कंबर कसून कामाला लागलेल्या शेतकर्‍यांच्या शेतीसाठी व शेततळ्यांसाठी शासन- प्रशासनाने मदतीचा हात देण्यासाठी शासकीय नियम अटींना मुरड घालून बळीराजाचं भलं करण्यासाठी पुढे येणे गरजेचे झाले आहे.

जत-उंटवाडी रस्त्याची दुरवस्था
जत,(बातमीदार): जत-उंटवाडी,रावळगुंडवाडी डांबरी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. डांबरी रस्ता असला तरी तो आता खाडी करणाचा रस्ता झाला आहे. डांबरी रस्ता जागोजागी कातारलेला आहे. जत-उंटवाडी हा रस्ता चौदा किलोमीटरचा यात जवळजवळ सहा किलोमीटर रस्ता अत्यंत खराब झाला आहे. पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांनी लक्ष देउन हा रस्ता दुरुस्त करून घ्यावा अशी मागणी होता आहे. 

अमृतवाडी-चिंचफाटा खाडीकरणाची मागणी
जत,(बातमीदार): अमृतवाडी ते विजापूर मार्गावरील चिंच फाटा हा रस्ता नेहमीचा रहदारीचा आहे. मात्र हा रस्ता खराब आहे. बाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने हा रस्ता अतिशय रुंद झाला आहे.एका मोठ्या शेतकर्यांने  हा रस्ता  बळकावला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने हा रस्ता ताब्यात घेऊन रहदारीसाठी खुला करावा. मोठी वाहने या मार्गावरून जात नाहीत. या मार्गावर ओढापात्र आहे. यावर पुला बांधण्यात यावा, अशीही मागणी होत आहे. अमृतवाडी ते स्मशान भूमी पर्यंत रस्ता झाला आहे. आणखी एका किलो मीटर रस्ता रुंद करून त्याचे खडीकरण करावे, अशी मागणी होत आहे.


महिला बचत गट उरलेत फक्त नावालाच!
जत,(बातमीदार):महिला बचत गटांना कुठलेच मार्गदर्शन न मिळाल्याने अनेक बचत गट बंद पडत आहेत. त्यामुळे बचत गटांच्या मुख्य हेतूलाच हरताळ फासला जात आहेत. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सुरू असणारे बहुतांश बचत गट फक्त नावापुरतेच उरले असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. 
बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आपण राहत असलेल्या परिसरात लघुउद्योग, मोठे उद्योग उभारणीसाठी, तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटांची संकल्पना पुढे आली. शहरातील, जत तालुक्यातील अनेक महिला बचत गटांनी चांगले काम करून छोट्या उद्योगांची उभारणी केली आहे. शहरात पालिका प्रशासनाच्या महिला व बालकल्याण समितीकडे महिला बचत गटांची नोंदणी झालेली नाही . यात नगरपालिकेचे अक्ष्यम दुर्लक्ष होत आहे.महिला बचत गटांना कुठलेच व्यावसायिक मार्गदर्शन मिळत नसल्याने मार्गदर्शनाअभावी बचत गट बंद पडत आहेत. 

काही महिला बचत गट नावापुरतेच सुरू केले जातात व ते बंदही केले जातात. महिन्यातून एकदा गटांची कार्यशाळा घेणे, समन्वयकाने शहरातील वेगवेगळ्या भागांत जाऊन आढावा बैठक घेणे गरजचे असते. मात्र, शहरात असे होताना दिसत नसल्याने परिणामी अनेकांना बचत गटाच्या माध्यमातून मिळालेले रोजगार बंद होणार आहे.


जत तालुक्यातील ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी सुरू आहे
जत,(बातमीदार):तालुक्यातील पासष्ट ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवकांनी वार्षिक लेखापरीक्षणासाठी दप्तर सादर केले नाही, म्हणून जत पंचायत समिती ग्रामपंचायत विभागामार्फत त्या सर्व ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी सुरू आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत सर्व तपासणी पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला जाणार आहे. याशिवाय गंभीर दोष असणार्‍या ग्रामसेवकाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी ओमराज गहाणे यांनी दिली.
तालुक्यात ११६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ६५ ग्रामपंचायतींमधील दप्तराचे लेखापरीक्षण झालेले नाही, तर ३६ ग्रामपंचायतींमध्ये विविध विकास कामात गैरव्यवहार झाले आहेत. त्यापैकी काही प्रकरणात संबंधित ग्रामसेवकांना नोटीस काढून ती सर्व प्रकरणे निर्गत केली आहेत. तसेच काही प्रकरणात अपहाराची रक्कम भरून घेऊन ती प्रकरणे निर्गत केली आहेत. ही प्रकरणे पंधरा-वीस वर्षांपूर्वीची जुनी आहेत. त्यामुळे यातील काही ग्रामसेवक सेवानवृत्त, तर काहीजण बदली होऊन परगावी गेले आहेत व काहींचा मृत्यू झाला आहे. परंतु जत पंचायत समिती, ग्रामपंचायत विभाग सर्वतोपरी प्रयत्न करून माहिती एकत्रित करणार आहेत.
सोनलगी, काराजनगी, मोरबगी, सुसलाद, शेगाव, खंडनाळ, बाज, डोर्ली, बिळूर, बेवनूर, बोर्गी खुर्द, बोर्गी बुद्रुक, तत्कालीन जत ग्रामपंचायत आदी ग्रामपंचायतींचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. 


म्हैसाळ आवर्तन न झाल्यास जत तालुक्यालाही फटका
जत,(बातमीदार): पैसे भरल्याशिवाय म्हैसाळ योजनेचे आवर्तन नाही, असा ठामपणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील दाखवत शेतकर्यांवर सगळी जबाबदारी टाकली आहे. वसंतदादा आणि महांकाली कारखान्याने काही प्रमाणात जबाबदारी स्वीकारली आहे, पण अद्याप पैसे भरले नाहीत. त्यामुळे या योजनेबाबत संभ्रमावस्था झाली आहे. सध्या पाण्याची मोठी गरज आहे. शासनानेही ताठरपणा कमी करावा आणि शेतकऱ्यांनीही पैसे भरावेत आणि योजना चालॊ ठेवावी अशी अपेक्षा जाणकारांकडॊन होत आहे.
जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. जतला पाणी पुरवठा करणारया बिरनाळ तलावात अत्यंत कमी पाणी आहे. यातील पाणी संपले तर जतला पांयाच्याबाबतीत हाहाकार उडणार आहे. या पाण्यामुळे आणखी पंधरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पण आता त्यांनाही पाण्याची गरज आहे. म्हैसाळ योजनेच्या अधिकार्‍यांनी पाणीपट्टी वसुली व पाणी मागणी अर्ज भरण्याबाबत शेतकर्‍यांना आवाहन केले आहे. शेतकर्‍यांनीही याला प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. मात्र त्याला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. म्हणून पाणीपट्टी वसुली व पाणी मागणी अर्ज भरण्याबाबत शेतकरी टाळाटाळ का करतात, याचाही विचार होणे गरजेचे आहे. 
जिल्ह्याच्या राजकारणात गेली २५ वर्षे महत्त्वाचा भाग असणारी ही योजना, आजही अनिश्‍चिततेत अडकली आहे. खा. संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप या सत्ताधारी नेत्यांवर आता ही योजना नियमित चालविण्याची जबाबदारी आली आहे. पण नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. म्हैसाळ योजनेच्या पुढील कामासाठी ३२ कोटी मंजूर झाले. पण हजारो कोटी खर्चून निर्माण झालेली ही योजना, पाणीपट्टी भरली नाही म्हणून बंद आहे. सध्या ऐन थंडीतच दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे, तर येणारा उन्हाळा किती भीषण असेल, याच चिंतेत शेतकरी आहेत. पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी नाही, या भाजप सरकारच्या भूमिकेने शेतकरी अडचणीत आला आहे. जिल्ह्यात टॅँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव येत आहेत. संकाटात असलेला शेतकरी व पशुधन वाचविणे सरकारचे आद्यकर्तव्य आहे. मोठय़ा उद्योगांना संकटातून बाहेर काढण्यासाठी हजारो कोटींचे पॅकेज सरकार देते, पण शेतकर्‍यांना मात्र मदत देण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे सक्तीने वसूल करत आहे. विरोधी पक्षात असताना शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करा म्हणणारे, आज सत्तेत येताच शेतकर्‍यांच्या सात-बारावर बोजा चढविण्याची भाषा करत आहेत. सरकारच्या या धोरणामुळे शेतकर्‍यांना हे आपले सरकार वाटणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


डफळापूर दरोड्याच्या तपासासाठी निवेदन
डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथील दरोड्याचा तातडीने छडा लावावा, या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी पोलीस उपअधीक्षक (गृह) रावसाहेब देसाई यांना दिले.
डफळापूर येथील दरोड्यात सुमारे सात लाखाचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला आहे. यावेळी नऊ जणांना मारहाण झाली. यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे गावात रात्रीच्या वेळी गस्त सुरू करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, सतेच तातडीने दरोडा प्रकरणाचा छडा लावावा, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी सरदेसाई यांना दिले. 
यावेळी सरपंच राजश्री शिंदे, उपसरपंच शंकरराव गायकवाड, माजी सभापती मन्सूर खतीब, बाजार समितीचे संचालक अभिजित चव्हाण, पाणी पुरवठा योजनेचे संचालक बाळासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य उत्तम संकपाळ, सुरेश माने, पोपट शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 


माडग्याळ टॅँकरच्या प्रतीक्षेत; तीव्र आंदोलनाचा इशारा
जत,(बातमीदार):माडग्याळ  येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, जादा टॅँकरची मागणी करूनही ती अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. यामुळे परिसरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
माडग्याळ व परिसरातील वाड्या-वस्त्यांवर पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. दहा हजार लोकवस्ती असणार्‍या या गावासाठी सध्या दोन टॅँकर सुरू आहेत. वाड्या, वस्ती आणि गावासाठी एकूण सहा टॅँकरची मागणी करण्यात आली आहे, मात्र अद्यापही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. पाण्यासाठी नागरिकांना दाहीदिशा फिरावे लागत आहे. पाण्यासाठी रहिवासी तीन ते चार किमी अंतरावरू न एक दोन घागरी पाणी आणावे लागत आहे. यामध्ये पाण्याअभावी जनावरांच्या हाल होत आहेत. पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने परिसरातील पशुधनच धोक्यात येण्याची शक्यता आहे. पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असतानाही प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत आहे. पाण्यासाठी संघर्ष केला, तरच आमच्या वाट्याला पाणी येणार का? असा संतप्त सवाल नागरिकांतून होत आहे. परिसरात शेतकर्‍यांची मोठी संख्या आहे, पण पाणी नसल्याने शेतीचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 





No comments:

Post a Comment