Saturday, December 3, 2016

जातीव्यवस्था असेपर्यंत आरक्षण राहणारच : डॉ. भालचंद्र मुणगेकर


जत,(प्रतिनिधी)-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी करून लिहिलेल्या राज्यघटनेत बदल करणे शक्य नाही असे सांगून जोवर या देशात जातीयव्यवस्था अस्तीत्वात राहील तोवर आरक्षणात कसलाही बदल करता येणार नाही. त्याचबरोबर दलितांसाठी कवचकुंडले असणारा ऍस्ट्रॉसीटी कायदय़ाला कुणीही हात लावू शकणार नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा समता अभियानाचे संस्थापक, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी  जत येथे बोलताना केले.
जत तालुका समता अभियान संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या अधिवेशनात मार्गदर्शन करताना डॉ. मुणगेकर बोलत होते. येथील राजमाता अहिल्यादेवी सभागृहात पार पडलेल्या या अधिवेशनाला जत तालुक्यातील सर्वच समाजातील बहुसंख्य लोक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विलासराव जगताप होते.
डॉ. मुणगेकर या अधिवेशनाला मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, स्वातंत्र्य मिळून या देशाला सत्तर वर्षे ओलांडली तरीही गावकुसाबाहेर राहणाऱया झोपडयातील माणसांचं जीवन अजूनही समृध्द झालं नाही. भटक्या विमुक्त जमातीतील माझ्या माता भगिणींना आजही अंगावर घालायला वस्त्र नाही ही शोकांतिका आहे. म्हणूनच आपण समता अभियानाच्या माध्यमातून एक कृतीबध्द कार्यक्रम हाती घेवून समतेचा विचार रूझवण्याचे काम हाती घेतले आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना दिली, विचार दिला. त्याचपध्दतीने फुले, शाहू, राजा शिवराय यांचे विचारांची खऱया अर्थांनी अमंलबजावणी करण्याची गरज आहे. डॉ. आंबेडकरांचा विचार एका शब्दात शब्दबध्द करायचा म्हंटल्यास समता हे एकच वाक्य पुरेसे आहे.
म्हणूनच आम्ही 20 जुलै 2016 रोजी समता अभियानाची स्थापना केली. या अभियानाची सुरूवात झाल्यानंतर जळगाव, मिरज येथे अधिवेशन झाले. त्यानंतर आज जतेत होत आहे. याच महीन्यात 24 डिसेंबरला आम्ही मुंबईत संविधान सन्मान मोर्चाचे आयोजन केले आहे. समता अभियान ही संस्था कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही. या संस्थेने पंधरा कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. यात प्रामुख्याने जातीच्या दाखल्यासाठी असणारी 50 वर्षांची अट रदद करावी, खासगीकरण शिक्षणात सर्वांनाच सवलतीच्या दरात शिक्षण मिळावे, जात पडताळणी कायदा रदद करावा, दलित, आदीवासी, भटके, मुस्लीम यांच्यासाठी लोकसंख्येनुसार देण्यात येणारा निधी आजही राज्य व केंद्र सरकारकडून खर्ची केला जात नाही, तो करण्यात यावा, परवाना नसलेली सावकारी बंद करण्यात यावी, नोकरभरती अनुशेष भरून काढण्यात यावा, आर्थिक निकषानुसार आरक्षण देताना केवळ एकाच समाजाचा विचार करू नये आदी प्रश्नांसाठी यापुढे आमची लढाई असणार आहे.
ऍस्ट्रोसिटी बाबतीत कसल्याही दुरूस्तीला आमचा विरोध राहील कारण या देशात आजही सव्वा लाख पेसेल न्यायालयात निकालाविना प्रलंबीत आहेत. त्यामुळे दलितांसाठी ते कवच कुंडले आहेत, तिला धक्का लावू देणार नाही असेही डॉ. मुणगेकर यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकडॉ. नामदेव कस्तुरे, संजय कांबळे यांनी केले. सुत्रसंचालन भूपेंद्र कांबळे यांनी तर आभार शंकर वाघमारे यांनी मानले. 

No comments:

Post a Comment