Monday, April 20, 2020

पहिली ते आठवीच्या मूल्यमापनाबाबत शिक्षक,पालकांमध्ये संभ्रम

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत . मात्र , या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करायचे आहे की नाही किंवा निकाल  तयार न करताच या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यायचा आहे  का, याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे . हा संभ्रम मिटवून मूल्यमापन , निकाल की थेट प्रवेश याबाबत मार्गदर्शन करण्याचा  योग्य आदेश मिळावा , अशी मागणी विविध शिक्षकांच्या संघटनांनी  शिक्षण संचालक व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे .

यावर्षी अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या . इयत्ता पहिली ते आठवीसह नववी , दहावी , अकरावीचे पेपरही रद्द करण्यात आले . नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सरासरी गुणांनुसार व्हावे , असे जाहीर करण्यात आले असले तरी पहिली ते आठवीच्या विद्याथ्यांचे मूल्यमापन करायचे आहे की नाही , याबाबत काहीच मार्गदर्शन शिक्षकांना मिळलेले नाही. वार्षिक निकाल हा दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. आज एप्रिल महिना संपायला फक्त दहा दिवस राहिले आहेत. अजूनही इयत्ता पहिली ते आठवी इयत्तांचा निकाल कसा जाहीर करायचा, याबाबत काहीच हालचाल होताना दिसत नाही. शिक्षण विभागाने मूल्यमापनाबाबत योग्य मार्गदर्शन व आदेश देण्याची मागणी होत आहे.
 लॉकडाकन लागू झाल्यामुळे राज्यातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .  राज्यातील सर्वच शाळेतील शिक्षकांना दुसऱ्या सत्राचा अंतिम निकाल मूल्यमापन कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे , असे निवेदनात म्हंटले आहे . तसेच महासंघाकडून मूल्यमापना कशापद्धतीने केले जाऊ शकते तसेच निकाल कशाप्रकारे लावता येतील हे उदाहरणासह शिक्षणाधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे . याबाबत सूचना मिळाल्यानंतर शिक्षकांसमोरील चित्र स्पष्ट होऊ शकणार असून , मूल्यमापन करायचे की नाही हा प्रश्न सुटू शकणार आहे .

No comments:

Post a Comment