Thursday, April 9, 2020

भारतातील ४0 कोटी लोक दारिद्रय़ात जाणार

पॅरिसमधून एक बातमी आली आहे. जगातील कोरोना संसर्ग झालेल्या अनेक देशांमधील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. भारतालाही याचा मोठा फटका बसणार आहे. 'कोविड-१९'च्या प्रादुभार्वामुळे भारतावर गंभीर परिणाम होणार आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनाययझेशनने (आयएलओ)दिला आहे. कोव्हिड-१९ मुळे जगभरात या वर्षी दुसर्‍या तिमाहीत १९ कोटी लोकांच्या नोकर्‍या कमी होण्याची भीती असून, भारतात ४0 कोटी लोक दारिद्य्रात ढकलले जातील, असा इशारा आयएलओने दिला आहे.

सन १९४५ नंतर प्रथमच फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेने वाईट कामगिरी केली असून, कोविड-१९मुळे देशाची अर्थव्यवस्था पहिल्याच तिमाहीत सहा टक्क्यांनी घसरली आहे, असे बँक ऑफ फ्रान्सने म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत फ्रान्सची अर्थव्यवस्था 0.१ टक्क्यांनी घसरली होती. मात्र, या वर्षी कोविड-१९ मुळे व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने उणे वाढ झाली आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अर्थव्यवस्था मंदीत गेली आहे.जर्मनीला फटका बसला आहे.
जर्मनीची अर्थव्यवस्था दुसर्‍या तिमाहीत तब्बल १0 टक्क्यांनी घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. जर्मनीतील सहा प्रमुख संशोधन संस्थांनी हा इशारा दिला आहे. कोविड-१९ मुळे जर्मनीत गंभीर स्वरूपाची आर्थिक मंदी येण्याची भीती आहे, असेही या संस्थांनी म्हटले आहे. वर्षभरात जर्मनीची अर्थव्यवस्था ४.२ टक्क्यांवर येईल, असेही सांगितले जात आहे, तर बेरोजगारीचा दर ५.९ टक्के होण्याची भीती आहे.
दरम्यान,आयएलओने एक अहवाल तयार केला असून, 'आयएलओ मॉनिटर सेकंड एडिशन : कोविड १९ अँड वर्ल्ड ऑफ वर्क ', असे त्याचे नाव आहे. दुसर्‍या महायुद्धापेक्षाही कोविड-१९ची साथ हा मोठा पेच आहे, असे आयएलओने म्हटले आहे. विकसित आणि विकसनशील देशांमधील कामगार आणि व्यवसायावर आपत्तीचा डोंगर कोसळला आहे. यातून वाचण्यासाठी आपल्याला तातडीने, वेगाने आणि एकत्रितपणे पावले उचलावी लागतील, असे आयएलओचे महासंचालक गाय रायडर यांनी म्हटले आहे. विकसनशील देशांमधील सुमारे दोनशे कोटी लोक पायाभूत क्षेत्रात काम करीत आहेत आणि या सर्वांना मोठा धोका आहे. कोविड-१९मुळे या क्षेत्रातील लक्षावधी लोकांना आधीच फटका बसला आहे, असेही रायडर म्हणाले.
भारत, नायजेरिया आणि ब्राझील या देशांतील कामगारांना लॉकडाउनचा फटका बसला आहे, असे सांगून रायडर म्हणाले, भारतात ९0 टक्के लोक पायाभूत क्षेत्रात काम करतात. बहुसंख्य कामगारांना लॉकडाउनमुळे पुन्हा ग्रामीण भागाकडे परतावे लागले आहे. गेल्या ७५ वर्षांतील ही आंतरराष्ट्रीय सहकायार्ची परीक्षा आहे. जर एक जरी देश अपयशी ठरला, तरी आपण सर्व अपयशी ठरतील. समाजातील सर्व घटकांना आपल्याला मदत करावी लागणार आहे.भारत सध्याच्या आर्थिक अडचणीमुळे आर्थिक आणीबाणी लादण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात येते.

No comments:

Post a Comment