Thursday, May 21, 2020

खरीपपूर्व मशागतींची धांदल सुरू

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सध्या सांगली जिल्ह्यात खरीपसाठी मशागतींची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यंदा वेळेवर मान्सून दाखल होणार असल्याच्या वार्तेने मशागती कामांची धांदल उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शेत मशागतींच्या कामांना विलंब झाला होता. दरम्यान यंदा खते शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधवरच उपलब्ध केली जाणार आहेत.

कृषी विभागाने शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने शेतकऱ्याच्या बांधावर खते देण्याचे नियोजन केले आहे. सांगली जिल्ह्यात 33 शेतकरी गट, 14 शेतकरी कंपन्या आहेत. वाळवा  आणि कवठेमहांकाळ तालुक्यात 800 टन खत बांधावर दिले आहे. मे महिन्याच्या अखेरीस दहा हजार टन खतांचे बांधावर वाटपाचे उद्दिष्ट आहे. हंगामासाठी बियाणांची 52 हजार 853 क्विंटल तर खतांसाठी 1 लाख 29 हजार टनांची गरज आहे.
जिल्ह्यात यंदा खरीपाचे सरासरी 3 लाख 48  हजार हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा होतो. शिराळा तालुक्यात भात पिकाचे क्षेत्र अधिक असते. वारणा, कृष्णा नदी काठावर सोयाबीन ,भुईमूग तर शिराळा तालुक्यात धूळ वाफेवरील भात पेरणीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. उन्हाळी पाऊस चांगला झाला की, तातडीने पेरण्यांना गती येणार आहे. यंदा पाऊस ही चांगला पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. अनेक भागात मशागती पूर्ण झाल्या आहेत,  तर काही ठिकाणी मशागतींना आता सुरुवात झाली आहे.
यंदा चांगल्या पावसामुळे खरीपाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज गृहीत धरून कृषी विभागाने 52 हजार 853 क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे. त्यातील चाळीस टक्के बियाणे उपलब्ध झाली आहेत. खरीप हंगामात मागणी केलेल्या बियाणांमध्ये संकरित ज्वारी, संकरित बाजरी, सुधारित बाजरी, भात, मका, टूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, वाटाणा, तागाच्या बियाणांचा समावेश आहे.
सांगली जिल्ह्यात तृणधान्य क्षेत्र 1 लाख 54 हेक्टर, कडधान्य 35 हजार300 हेक्टर, अन्नधान्य 1 लाख 89 हजार 400 हेक्टर, गळीत धान्य 86 हजार 700 हेक्टर आणि ऊस क्षेत्र 70 हजार 800 हेक्टर आहे.

No comments:

Post a Comment