Saturday, January 7, 2023

शाळा तपासणी अधिकाऱ्यांना ओळखपत्राची सक्ती करा

सांगली,(मच्छिंद्र ऐनापुरे)-

सोलापूर जिल्ह्यातील काही शाळांमध्ये शिक्षण अधिकारी असल्याचे सांगून शाळांची तपासणी करताना काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असा प्रकार टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला ओळखपत्र बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. याशिवाय मुख्याध्यापकांनीही शाळेत येणाऱ्या व्यक्तीला ओळखपत्र पाहिल्याशिवाय  शाळेत तथा वर्गात प्रवेश देऊ नये. ऊठसूट शाळेत येणाऱ्या  व्यक्तींना पायबंद घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. 

सहायक शिक्षणाधिकारी असल्याचे खोटे सांगून तोतया व्यक्‍तींनी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर व टेंभुर्णोतील जिल्हा परिषद शाळांची तपासणी करण्याचा प्रयत्न केला. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जिल्हा परिषद शाळांची तपासणी करताना एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. फिरदोस गफ्फार शेख व शाहिद ठल्लू खान हे दोघे दक्षिण सोलापुरातील शाळांची तपासणी करीत होते. आपण सहायक शिक्षणाधिकारी असल्याचे सांगून बनावट ओळखपत्र दाखवून हा प्रकार सुरू होता. वळसंग पोलिसांना त्यासंबंधीची माहिती मिळताच, त्यांनी दोन्ही संशयितांकडे चौकशी केली. नांदेड व सोलापूर जिल्हा परिषदेत ती महिला कार्यरत नसल्याचे उघड झाले. आता साक्षीदारांची तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचेही जबाब घेतले जात आहेत. त्यानंतर पोलिस पुढील कारवाई करतील.  मात्र  काळात या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच दरम्यानच्या काळात टेंभुर्णी येथेही तसाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये याविषयी चर्चा सुरू झाली आहे. काही वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील काही शाळांमध्ये पाठ्यपुस्तकातील कवी असल्याचे सांगून शिक्षकांना गंडा घालण्याचा प्रकार झाला होता. याशिवाय गावातील तसेच परिसरातील काही लोक शिक्षकांना दमदाटी करत शाळांमध्ये घुसतात. मद्यपान करून काही लोक शाळेत शिरतात. या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी अचानकपणे शाळा तपासणी करतात. विद्यार्थ्यांचे अध्यायन कसे सुरू आहे, शिक्षक शाळेच्या वेळेत काय करतात, कोण परस्पर रजेवर किंवा दुपारूनच घरी जात आहेत का, पोषण आहार चांगला आहे का, वेळेत दिला जातो का, अशा मुद्यांची पडताळणी अधिकारी वेळोवेळी करत असतात.  शिक्षक, मुख्याध्यापकांना आपल्या विभागाचे जिल्ह्यातील अधिकारी ओळखीचेच असतातच असे नाही. याशिवाय काही कारणांमुळे  महसूल विभागाचे, आरोग्य विभागाचे अधिकारी शाळांमध्ये जातात. त्यामुळे याचा फायदा घेत काही शाळांमध्ये तोतया अधिकारी जाऊन शाळा तपासणीचे धाडस करत आहेत. त्यामुळे शाळा तपासणी करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांना ओळखपत्राची सक्ती करण्यात यावी व ते पाहिल्याशिवाय मुख्याध्यापक किंवा शिक्षकांनी कुणाही बाहेरच्या व्यक्तीला शाळेत प्रवेश देऊ नये, यासाठीचे प्रशासनाने आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.


No comments:

Post a Comment