Sunday, September 5, 2021

स्वर्गाचा दरवाजा


एकदा आभाळात दोन ढगांची भेट झाली. काळा ढग पाण्याने जड झाला होता. तो जमिनीकडे उतरत येत होता. गोरा ढग अगदी हलका होता. तो उंच आभाळात चढत होता. भेट झाल्यावर गोऱ्या ढगाने काळ्याला विचारले, कुठे चाललास? काळा ढग म्हणाला, जमिनीकडे. मी तिथे जाऊन पाऊस पाडणार आहे. माझ्याजवळ जेवढे पाणी आहे ते सगळे धरणी मातेला देऊन टाकणार आहे.

जमीन उन्हाने तापली आहे. नद्या, तलाव, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. झाडेपण सुकून गेली आहेत. शेतकरी आतुरतेने माझी वाट पहात आहेत. मला जरा घाईने गेले पाहिजे. गोरा ढग त्याला हसला. त्याला म्हणाला, वेडाच आहेस. आपली संपत्ती कधी अशी कोणी जगावर उधळून देतो का? तुझ्यातले पाणी

संपले कि तुझे आयुष्यच संपले की! मी चाललोय स्वर्गात. देव बाप्पाच्या घरी एक जागा रिकामी झालीय. ती मला मिळेल. गोऱ्या ढगाला खूप घाई होती. तो धावतच पुढे निघाला, काळा ढग हळूहळू जमिनीपर्यंत आला. मुसळधार पाऊस झाला. काळा ढग अदृष्यच झाला. नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले. तलाव विहिरी काठोकाठ भरले. सारे रान हिरवेगार झाले. शेतकरी सुखावले.

गोरा ढग वर जाताना ते पहात होता. काळ्या ढगाच्या

वेडेपणाला तो हसला. पाहता पाहता स्वर्गाचा दरवाजा आला. गोऱ्या ढगाने दार ठोठावले. एका देवदूताने ते उघडले. त्याने गोऱ्या ढगाला विचारले, तुझे देवबाप्पाकडे काय काम आहे?

गोरा ढग आपल्याच तोऱ्यात होता. तो म्हणाला, मी इथे

रहायलाच आलोय, स्वर्गात एक जागा रिकामी झालीय. ती मलाच मिळणार! उघड दरवाजा. दार उघडायच्या ऐवजी देवदूताने ते लावूनच घेतले. लावता लावता तो म्हणाला, ती रिकामी जागा आता भरलीय. देवबाप्पा स्वतः विमान घेऊन गेले होते व त्या काळ्या ढगाला स्वर्गात घेऊन आले. ज्याने आपले सर्वस्व देऊन

पृथ्वीवर आनंदी आनंद निर्माण केला, त्याच्यापेक्षा आणखी चांगली व्यक्ती कोण असणार?

तात्पर्य : समाजासाठी सर्वस्व समर्पण करणे हाच मोक्ष आहे. आपल्या आजूबाजूच्या सर्वांना सुखी करणे, त्यांना काही न काही मदत करणे यातूनच माणूस सुखी समाधानी होऊ शकतो.

*******

शाळा : शाळेत उशिरा आले की शेवटच्या बाकावर बसावे लागते.

कॉलेज : कॉलेजमध्ये उशिरा आले की पहिल्या बाकावर बसावे लागते.


No comments:

Post a Comment