Wednesday, December 29, 2021

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा साळमळगेवाडी येथे सत्कार


जत,(प्रतिनिधी)- सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने नुकत्याच शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या विविध क्रीडा पार पडल्या.यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व गुणवंत शिक्षकांचा मॉडेल स्कूल म्हणून साकारत असलेल्या साळमळगेवाडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशीराम पडोळे होते. 

व्हॉलीबॉलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे जिरग्याळ केंद्राचे केंद्रप्रमुख रतन जगताप, क्रिकेट व खोखोमध्ये उत्तम  कामगिरी करणारे बाळासाहेब जायभाये ,जिल्हा परिषदेचा व शिक्षक नेते कै. शिवाजीराव पाटील जीवन गौरव प्राप्त शिक्षक मच्छिंद्र ऐनापुरे व रामेश्वर करळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पडोळे यांचाही सत्कार करण्यात आला. 

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक विद्याधर गायकवाड यांनी केले. आभार मुख्याध्यापक गुलाबसिंह पावरा यांनी मानले. यावेळी विठ्ठल कोळी, शहाजी वाघमारे, सीताराम यादव, मनोहर जाधव, शुभांगी पाटील, जयश्री देवमाने, दत्ता खांडेकर, शिवाजी सुतार व पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, November 16, 2021

प्रदुषणाच्या भस्मासुराने एका वर्षात तीन लाख मृत्यू


भारतासह जगभरातले बरेच देश सध्या प्रदुषणाशी लढताना दिसत आहेत. याच दरम्यान युरोपीय पर्यावरणीय यंत्रणेने हे जाहीर केले आहे की, वायू प्रदुषणामुळे तीन लाख सात हजार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, वायू प्रदुषणामुळे जगात दरवर्षी ७० लाख जणांचा अकाली मृत्यू होतो.

युरोपीय पर्यावरण यंत्रणेच्या एका अहवालानुसार, जर युरोपीय संघातली राष्ट्रे जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या वायू गुणवत्ता निर्देशांचे पालन केले, तर ही संख्या अर्ध्याहूनही कमी होऊ शकते. या अहवालानुसार, १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला हवेतल्या सूक्ष्म कणांनी फुफ्फुसात खोलवर प्रवेश केल्याने युरोपीय संघातल्या २७ देशामधल्या एक लाख लोकांचा अकाली मृत्यू झाला होता. तर २००५ पर्यंत हा आकडा दुप्पट होऊन ४ लाख ५० हजारांवर पोहोचला.

२०१९ मध्ये हवेत मिसळलेल्या या सूक्ष्म कणांमुळे जर्मनीमध्ये ५३, ८००, इटलीमध्ये ४९,९००, फ्रान्समध्ये २९,८०० तर स्पेनमध्ये २३,३०० जणांचा अकाली मृत्यू झाला. तर पोलंडमध्ये ३९,३०० जणांचा मृत्यू झाला. अहवालानुसार, कार, ट्रक आणि थर्मल पॉवर स्टेशन्समधील नायट्रोजन ऑक्साईडमुळे २०१८ आणि २०१९ मध्ये होणाऱ्या मृत्यूंमध्ये एक चतुर्थांथ प्रमाणात घट झाली, त्यामुळे हा आकडा ४० हजारांवर आला होता.

एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, वायूप्रदुषणामुळे हृदयविकार, कॅन्सर तसेच फुफ्फुसांच्या आजारांच्या प्रमाणात वाढ होते. तर लहान मुलांच्या फुफ्फुसांच्या विकासामध्ये वायू प्रदुषणामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे श्वसनाचे विकार उद्भवू शकतात. परिस्थितीमध्ये सुधारणा होत असली तरी अजूनही हे चिंताजनकच आहे. दिल्लीमधल्या वायूप्रदुषणाने अतिगंभीर पातळी गाठली आहे. त्यामुळे आता राजधानी अक्षरशः गॅस चेम्बर होताना दिसत आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोच असून लॉकडाउनसारख्या उपायांवर विचार केला जात आहे.

Friday, October 29, 2021

पुनीत राजकुमार, सिद्धार्थ शुक्ला, राज...या स्टार्सचा 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला


काल शुक्रवारी प्रसिध्द कन्नड अभिनेता पुतीन राजकुमार यांचे हृदयविकाराने निधन झाले. आपल्याला माहीतच आहे की, गेल्या वर्षभरात बॉलिवूड क्षेत्रासह अनेक सेलिब्रिटींनी या जगाचा निरोप घेतला आहे.  गेल्या वर्षी जिथे कोविडच्या कहरामुळे अनेक स्टार्सचे निधन झाले, तिथे काही सेलिब्रिटींच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका ठरले. या निमित्ताने अशा स्टार्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचे यावर्षी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जगाला अखेरची सलामी दिली.

 पुनीत राजकुमार : कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार याने शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने या जगाचा निरोप घेतला.  46 वर्षीय पुनीतच्या निधनाने चाहते आणि स्टार्स हळहळ व्यक्त  करत आहेत. सुप्रसिद्ध कन्नड अभिनेता डॉ.राजकुमार यांचा पुतीन हा चिरंजीव आहे. त्यांनी अनेक हिट चित्रपटात काम केले असून त्यांचे काही चित्रपट हिंदी सह अनेक भाषेत भाषांतरीत झाले आहे.

 सिद्धार्थ शुक्ला: 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थच्या निधनाच्या बातमीवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.  ही बातमी अफवा ठरावी, अशी प्रत्येकाची इच्छा होती, पण तसे झाले नाही.  बिग बॉस 13 चा विजेता ठरलेल्या सिद्धार्थने वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

 राज कौशल: दिग्दर्शक, निर्माता आणि स्टंट दिग्दर्शक राज कौशल यांनी 30 जून 2021 रोजी अखेरचा श्वास घेतला.  मंदिरा बेदी यांच्या या 50 वर्षीय पतीच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला.

 अमित मिस्त्री: अमित मिस्त्री यांनी चित्रपटांसोबतच थिएटर आणि टीव्हीमध्येही आपली आवड पसरवली होती.  अमित यांचे 23 एप्रिल 2021 रोजी वयाच्या 47 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

 राजीव कपूर : अभिनेते राजीव कपूर यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.  राजीव यांना ९ फेब्रुवारी 2021 रोजी हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 सुरेखा सिक्री: 16 जुलै 2021 रोजी ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  सुरेखा यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सरोज खान: स्मरण करून द्या की 2020 च्या सुरुवातीला बॉलीवूडच्या दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  सरोज यांनी 3 जुलै 2020 रोजी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.


Thursday, October 28, 2021

या' मूलांकाचे लोक आहेत मस्तमौला, हे लोक जगतात आपले जीवन मोकळेपणाने

अंकशास्त्राच्या या प्राचीन पद्धतीनुसार, ज्या लोकांचा मूलांक  4 आहे, असे लोक खूप मजेदार असतात आणि नेहमी हसतमुख असतात. 


अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्रासारखेच एक शास्त्र आहे, ज्यामध्ये अंकांच्या मदतीने लोकांच्या भविष्याची माहिती मिळवता येते.  हिंदीत याला अंकशास्त्र आणि इंग्रजीत Numerology असे म्हणतात.  या प्राचीन विज्ञानात, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारीखातून एक मुख्य संख्या तयार होते, ज्याला मूलांक म्हणून ओळखले जाते.  उदाहरणार्थ, महिन्याच्या 4, 13 किंवा 22 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो.  असे म्हटले जाते की प्रत्येकाचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व एकमेकांपेक्षा वेगळे असते, हे मूलांकामुळे असू शकते.

जाणून घ्या मूलांक 4 बद्दल: असे म्हणतात की मूलांक नंबर 4 च्या लोकांचा स्वभाव खूप मस्त असतो.  4, 13 किंवा 22 तारखेला जन्मलेल्यांचा असा विश्वास आहे की जीवन मुक्तपणे जगले पाहिजे कारण ते एकदाच मिळते.  त्यांच्या मते, उद्याची आशा नाही, त्यामुळे जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यावा.

चेष्टा-मस्करी करण्यात ते पुढे आहेत: अंकशास्त्राच्या या प्राचीन पद्धतीनुसार, मूलांक नंबर 4 असलेले लोक खूप मजेदार असतात आणि नेहमी हसत असतात.चेष्टा मस्करी करत असतात.या लोकांना आनंद वाटून घेण्यासाठी ओळखले जातो. दुसऱ्यांना आनंद वाटतात.  असे म्हणतात की हे लोक स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम आहेत तसेच थंड डोक्याचे आहेत.  तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे लोक त्यांचे निर्णय अतिशय काळजीपूर्वक घेतात.

प्रेमविवाहावर विश्वास ठेवतात : असे म्हटले जाते की या राशीच्या लोकांवर सौंदर्याचा खूप प्रभाव असतो.  असे म्हणतात की, आनंद वाटून घेणारे हे लोक अनेकांना त्यांचे दुःख सांगत नाहीत.  आपल्या गोष्टी एखाद्या खास व्यक्तीसोबत शेअर करणाऱ्या या लोकांचा लव्ह मॅरेजवर खूप विश्वास असतो.  तज्ज्ञांच्या मते, या मूलांकाच्या लोकांचे मित्र खूप सुंदर असतात.

Saturday, October 23, 2021

तुमची सकाळ "आनंदी आनंद गडे" होण्यासाठी...


आपला दिवस छान जावा,कसली कटकट मागे लागू नये, असे प्रत्येकाला वाटत असते. पण यासाठी आपण सकारात्मक राहिले पाहिजे. सकाळी उठल्यापासूनच तसे प्रयत्न राहिले पाहिजे. सकाळी उठल्यावर आपण मनात चांगले विचार आणि चांगल्या गोष्टी पाहिल्या तर तुमची सकाळ हॅपी हॅपी होऊन जाते... सकाळी उठल्या उठल्या डोळ्यांसमोर तुमच्या आवडीच्या व्यक्तीचे चित्र (प्रतिमा) आणा. तुमच्या 'हिरो'ची प्रतिमा पाहा. चांगल्या विचारांच्या ओळी वाचा. रात्री झोपताना तुमच्या शेजारी जवळ प्रेरणादायी पुस्तक ठेवा,सकाळी उठल्यावर त्याची काही पाने वाचा. म्हणजे तुमच्या मनाला उभारी येईल. सकाळी उठताना मोबाईलकडे दुर्लक्ष करा. नाहीतरी दिवसभर मोबाईल तुमची पाठ सोडतच नाही,मग निदान सकाळी तरी त्याला काही काळ बाजूला ठेवा.

आणखी एक गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर अनेकांना आरसा पाहण्याची सवय असते. पण सकाळी झोपेतून उठल्यानंतर आरशात पाहू नये. कारण झोपेतून उठल्यानंतर तुमचा चेहरा, कपडे आणि बॉडी फ्रेश नसते. निस्तेज चेहरा आरशात पाहिल्यावर

तुम्ही आणखी निराश होऊ शकता. त्यामुळे चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन अगोदर फ्रेश व्हा. नंतर आरशात चेहरा पाहा. तुमचा फ्रेश चेहरा आरशात पाहून तुम्हाला आणखी उत्साह येईल आणि तुमचा दिवस छान जाईल.

सकाळी झोपेतून उठल्यानंतर न धुतलेली किंवा घाणेरडी कपडे परिधान करू नका. यामुळे तुमचा संपूर्ण दिवस खराब जाऊ शकतो. रात्री झोपतानाही घाणेरडे कपडे घालून झोपू नका. कारण त्यामुळे तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यावर मरगळल्या सारखे होईल. रात्री झोपताना घातलेल्या कपड्यांवरच सकाळी

वावरू नका. यामुळे तुमचा आळस आणखी वाढेल. सकाळी उठल्याबरोबर फ्रेश होऊन दुसरे स्वच्छ कपडे परिधान केल्यास तुमच्या अंगात उत्साह निर्माण होईल.

खूप उशिरा उठल्यावरही अंगात आळस असतो. त्यामुळे हॅप्पी गुड मॉर्निंगसाठी सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन बाहेर हवेशीर फिरायला जा. यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल तसेच आयुष्यही सुंदररित्या जगण्याचा मार्ग सापडेल.


Thursday, October 14, 2021

खरसुंडीची सिद्धनाथ योगेश्वरी


खरसुंडी येथे श्रीसिद्धनाथांचे प्राचीन हेमांडपंथी मंदिर आहे. मंदिर परिसरात देखण्या दीपमाळा आहेत. नाथांच्या दर्शनासाठी राज्य-परराज्यातून भक्त येतात. नवरात्रोत्सवात बाळाबाई तथा योगेश्वरीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. श्री सिद्धनाथांचे मूळ ठिकाण म्हसवड, चिंचाळे गावच्या नयाबा गवळी सिद्धनाथाचे भक्त त्यांनी आपल्या भक्तीच्या बळावर गावच्या पूर्वेस असलेल्या डोंगरावर साकडे घातले. तिथे कपिला गायीच्या खरवसातून शिवलिंग साकारले. खरवस पिंडीवरून गावाला खरसुंडी हे नाव प्रचलित झाले. सिद्धनाथांना सात पत्नी होत्या. नाथांच्या मूर्ती सोबत बाळाबाई तथा योगेश्वरी विराजमान आहेत. यांसह विघ्नेश्वरी, मळाबाई, जनाई, जोगेश्वरी, छोटी जकाई व मोठी जकाई अशा देवींची मंदिरे परिसरात आहेत. योगेश्वरी देवीचे आंबेजोगाई येथील मूळ ठिकाण. उत्सवामध्ये पाचवेळा श्री नाथाची उत्सव पालखी सर्व लवाजम्यासह भेटीला येते. चैत्री यात्रेला सासनकाठी सोहळा, पौष पौर्णिमा, पारधी पौर्णिमा, तीन वर्षातून होणारी जकाई भेट यात्रा व नवरात्र उत्सवातील हर जागर सोहळा होत असतो. नवरात्रोत्सवात जोगेश्वरी मंदिरात पालखी मुक्काम असतो. यावेळी रात्री हर जागर व सकाळी साखर वाटप असा सोहळा होतो. श्री नाथांच्या मुख्य उत्सवात जोगेश्वरीच्या मूळ ठिकाणाहून त्यांचे मानकरी खरसुंडीत नैवेद्य व पूजा करून प्रत्येक वर्षी दर्शनासाठी येतात.


कडेगावची डोंगराई देवी


कडेगाव शहराच्या दक्षिणेला कडेपूरच्या डोंगरावर डोंगराईदेवीचे प्राचीन मंदिर आहे. गिरीकंदरातील अतिप्राचीन असे हे शक्तीपीठ आहे. मध्ययुगात इ. स. १२०९ मध्ये राजा भोज यांचा देवगिरीचा सम्राट सिंधण यादव यांनी पराभव करून दक्षिण सातारा (पूर्वी सांगली, सातारा जिल्ह्यांत होती) कोल्हापूर भागावर सत्ता प्रस्थापित केली. त्यांच्या पदरी असलेल्या हेमाद्रिपंताने महाबळेश्वर येथे बरीच हेमाद्रिपंताकडून महाबळेश्वराच्या पूर्वेस १६० कि.मी. कडसूर पर्वत पूर्वीचा लिंगराज पर्वत या डोंगरावर म्हणजेच आताचे श्री क्षेत्र “डोंगराई" या ठिकाणी मंदिर उभारल्याचे मानले जाते. शिर्के व जावळीच्या मोरे घराण्याची सत्ता आल्यावर अनेक सरदार व कडेपूरच्या यादव-देशमुख घराण्यांनी देवीच्या मंदिराची वेळोवेळी डागडुजी केली. त्यांनी कडेपूरचे लढाऊ यादव-देशमुख व परिसरातील शेकडो भक्त हाताशी धरून, तटबंधी गड बांधला. उत्तर दिशेला औंधच्या देवीकडे तोंड करून चिरेबंदी मोठा दरवाजा बांधला. गडावर पायऱ्या केल्या. या डोंगराई गडावरून चारी दिशांची स्पष्ट टेहळणी केंद्र म्हणून निवड करून, तोफखाना व्यवस्था केली. बारा वर्षे तीर्थथान करून इ. स. १६४५ साली, श्री समर्थ रामदास स्वामी चाफळहून उंब्रजमार्गे प्रथम काडासूर तर आताचे नाव कडेपूर या परिसरमध्ये आले. तेव्हा त्यांना या डोंगराईवर काहीतरी, दैविक गोष्टींचा साक्षात्कार झाला. डोंगराई मंदिरावर राजगुरू समर्थ रामदास स्वामी यांनी येथे मारुतीची व अन्य देवतांची स्थापना केल्याचे सांगितले जाते. सध्या आर्य समाजाचे देवीचे परमभक्त “पटवी बंधू भगिनी" व त्यांचे सर्व भागांत विखुरलेले अन्य नातेवाईक हे यासाठी डोंगराई परिसरात मोठी मदत करतात. या पुरातन मंदिरात अनेक देवी देवतांच्या पाषाण मूर्ती आहेत. वनराईने नटलेल्या या परिसरातील गगनचुंबी मंदिर एक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत आहे.