Saturday, September 8, 2018

जत तालुक्यातील शेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

जत तालुक्यातील  शेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

हवामान अंदाज चुकला; रब्बी पिकांवरही होणार परिणाम
जत,(प्रतिनिधी)-
भारत हा कृषी प्रधान देश आहे येथील अधिकतर नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहेत. तसेच भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. मात्र, मागिल काही वर्षांपासून सुखा, ओला दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यावर शेतकर्‍यांची परीस्थिती फारच दयनिय स्वरुपाची होत आहे, अशीच परिस्थिती पुन्हा यावर्षी जत तालुक्यातील शेतकर्‍यांची झालेली आहे. 
पावसाळा सुरू होऊन तीन महिने लोटले. तरीही जत तालुक्यात एकही मुसळधार पाऊस न पडल्यामुळे येथील नदी, नाले, विहिरी, तलाव अजुनही कोरडेच असल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत. यामुळे परिसरात दमदार पाऊस केव्हा पडणार? या प्रतिक्षेत शेतकरी चिंतातूर झाला आहे.
यावर्षी हवामान खात्याने दमदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, मागिल तीन महिण्यांपासून हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरत आहे. जत तालुक्यात फक्त 190 मी. मी. पाऊस पडला असल्याची माहिती मिळाली असून, या तालुक्यात दमदार पाऊस न पडल्यामुळे व अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे शेतातील पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. यंदाचा खरिप पूर्णपणे वाया गेला आहे.

ग्रामीण भागात असलेल्या नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती असल्यामुळे यावर त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. यातही अनेक शेतकर्‍यांची शेती कोरडवाहू असल्यामुळे त्यांची शेती निसर्गाच्या पावसावरच अवलंबून असते. मात्र मागील तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांना तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकर्‍यांची परिस्थिती अतिशय हलाकीची होत चालली आहे. त्यामुळे तो कर्जाच्या बोजाखाली दबत चालला आहे. यामुळे शेती कशी करावी मुलाबाळांचे शिक्षण, लग्न व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, अशाप्रकारचे अनेक संकट शेतकर्‍यांसमोर उभे टाकले आहेत. समाधानकारक पाऊस न झाल्याने नदी, नाले, विहिरी व तलाव कोरड्या स्थितीत आहेत. यामुळे याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर पडणार असल्याने खरिप पीक तर गेलेच शिवाय रब्ब्बी पिकाचीसुद्धा आशा नसल्याने परिसरात सर्वे करून शासनाने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

गुणवंत शिक्षकांचा मागासवर्गीय शिक्षक संघटनेमार्फत सत्कार

( सनमडी (ता.जत) येथील केंद्रशाळेत आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कार मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्यावतीने करण्यात आला.)





















जत,(प्रतिनिधी)-
सनमडी ( ता.जत) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत शिक्षक दिनानिमित्त सहारा ग्रुप संस्थेच्या वतीने पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना जत तालुका शाखेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी  साहित्यिक ,शिक्षक मच्छिंद्र ऐनापुरे (केंद्र-जिरग्याळ), सिद्धेश्वर कोरे(केंद्र-जाडरबोबलाद),प्रकाश माळी(केंद्र गुडडापूर),भाऊसाहेब महानूर (केंद्र-डफळापूर),प्रल्हाद हुवाळे( केंद्र-सनमडी) या पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा पुस्तके ,पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गावचे सरपंच सौ.रुक्मिणी पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तमन्ना कर्ले,तंटामुक्ती अध्यक्ष महादेव सलगर, राष्ट्रपती पदकप्राप्त ऑर्डनरी कॅप्टन उमाजी महानोर जिल्हा उपाध्यक्ष मलेशपा कांबळे, तालुका अध्यक्ष-सुनील सूर्यवंशी,अनिल मिसाळ ,संतोष काटे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी  शिक्षक दिलीप साळुंखे मान्यवरांचे स्वागत केले.संजय कोळी यांनी प्रास्ताविक केले .कार्यक्रमाचे नियोजन प्राणिशा गुरव यांनी केले.राकेश वसावे यांनी आभार मानले 

चांगली पिढी घडवण्याचे शिक्षकांपुढे आव्हान:स्वामी अमृतानंद महाराज

चांगली पिढी घडवण्याचे शिक्षकांपुढे आव्हान:स्वामी अमृतानंद महाराज

आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर

बिळूर:

आज मुलगा आई-वडिलांना विचारेना,व्यसनाधिनता, खून-हाणामार्‍या वाढल्या आहेत.सर्वत्र आराजकता माजली आहे. आजच्या मुलांवर संस्कार घडवण्याची गरज आहे.शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी फक्त गुणांच्या मागे लागलेले आहेत. समाज,देश आदर्श बनवायचा असेल तर पहिल्यांदा चांगली पिढी घडविणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बालगाव (ता. जत) येथील मठाचे स्वामी अमृतानंद महाराज यांनी बोर्गी (ता. जत) येथील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना केले.

बोर्गी येथील सहारा कला,क्रीडा,व्यायाम व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रवींद्र आरळी होते. यावेळी बोलताना अमृतानंद महाराज म्हणाले, सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला आशियाई स्पर्धेत फक्त 59 पदके मिळतात. मात्र इंडोनेशियासारखे छोटे देश शतकांवर पदके मिळवतात. आपल्याकडील शिक्षण पद्धती चुकीच्या मार्गाने चालली आहे.अभ्यास आणि गुण यांकडे आपण लक्ष देत आहोत. त्यामुळे खरे संस्कार बाजूला पड्त चालले आहेत. हे असेच चालू राहिले तर देशात आराजकता माजल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे संस्कारशील पिढी घडवण्याची गरज आहे. आणि शिक्षकांपुढे हे मोठे आव्हान आहे.

सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील यांनी जत तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता चांगली असून ती आणखी उंचावण्यासाठी आपले सहकार्य राहील, असे सांगितले. डॉ. रवींद्र आरळी यांनी कोणतेही कार्यक्रम आता पेपरलेस आणि फॉवरलेस व्हायला हवेत. उपस्थितांना पुस्तक भेट देण्याचा उपक्रम राबवावा हे सांगतानाच त्यांनी सहारा ग्रुपने शिफारस केलेल्या रुग्णास मोफत उपचार केले जातील, असे सांगितले.

यावेळी संभाजी कोडग, रामराव मोहिते,मच्छिंद्र ऐनापुरे, सिद्धू कोरे,कुमार चौगुले, प्रल्हाद हुवाळे, भाऊसाहेब महानोर आदी 28 शिक्षकांना प्रमाणपत्र, पदकासह आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक सहारा ग्रुपचे सचिव आशिफइक्बाल जाहगिरदार यांनी केले. प्रा.घन:शाम चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. आभार राजेंद्र बिराजदार यांनी मानले. जी.के.बिराजदार, अ‍ॅड, आडव्याप्पा घेरडे, अशोक बरडोल, सचिन होर्तीकर, संजय तेली,तम्मणगौडा रवी-पाटील यांनी सहारा ग्रुपला आर्थिक मदत जाहीर केली. गटशिक्षणाधिकारी बी.एन. जगधने, विनायक शिंदे, चनबसू चौगुले,संभाजी कोडग यांनी आपले मनोगत व्यक्त केले.लखन होनमोरे, मलकारी होनमोरे,गांधी चौगुले,लकाप्पा शिरगट्टी, मंडळाचे अध्यक्ष दावल पुळुजकर, उपाध्यक्ष मौलाली सातभाई,खजिनदार मल्लिकार्जून उटगी यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले.

 
फोटो ओळ(बोर्गी ता.जत येथील सहारा कला,क्रीडा,व्यायाम व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने जत तालुक्यातील 28 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी स्वामी अमृतानंद महाराज,जि.प.शिक्षण सभापती तम्मणगौडा रवी-पाटील,डॉ.रवींद्र आरळी,गटशिक्षणाधिकारी बी.एन.जगधने आदी उपस्थित होते.)

आवंढीमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार


आवंढीमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील आवंढी गावातल्या महिला गावात दारूबंदी व्हावी,यासाठी पुढे सरसावल्या आहेत. 10 सप्टेंबरपूर्वी गावात दारूबंदी झाली नाही तर दारूबंदी व उत्पादन शुल्कच्या जत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा गावातल्या महिलांनी दिला आहे.
पानी फौंडेशनच्या कामात भरीव काम करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरदेखील प्रभाव टाकणार्या या गावातल्या महिला आता गावात दारूबंदी व्हावी,यासाठी पुढे सरसावल्या आहेत. दारूमुळे या गावातील अनेक कुटुंबे उदवस्त झाली आहेत. अनेक कुटुंबे उद्वस्त होण्याच्या वाटेवर आहेत. महिलांना काही भागातून एकट्याने जाणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे, अशा परिस्थितीत संतापलेल्या महिलांनी गावात दारूबंदी व्हावी,यासाठी चंगच बांधला आहे. गावातील दारू अड्डे बंद व्हावेत,यासाठी काल गावातल्या महिलांनी थेट जतचे पोलिस ठाणे गाठले होते. या पोलिसांनी दारूबंदी व उत्पादन शुल्कच्या कार्यालयाकडे जाण्याचा सल्ला दिला. महिलांनी या कार्यालयाबाहेर गर्दी करून गावात दारूबंदी करण्याची मागणी केली.
दरम्यान, उत्पादन शुल्कचे अधिकारी एम.व्ही. शेंडे यांनी त्यांना आश्वासन दिले आहे. मात्र 10 सप्टेंबरपर्यंत गावात दारूबंदी झाली नाही तर कार्यालयापुढे उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. दारूबंदी समितीच्या अध्यक्षा संगीता दिलीप कोडग, उपाध्यक्षा रत्नमाला शामराव कोडग, सचिव प्रतिभा तानाजी कोडग, सहसचिव अर्चना सुधाकर कोडग, कांचन सुभाष कोडग या म्हणाल्या की, 24 ऑगस्टच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्यात आला आहे,परंतु आजपावेतो गावात दारूबंदी झाली नाही नाही. त्यामुळे आम्हाला आता रस्त्यावर उतरावे लागले आहे. आता गावात दारूबंदी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.



Monday, January 16, 2017

जतमधील शाळेत चोरी

जतमधील  शाळेत चोरी
जत,(प्रतिनिधी)-
जत येथील शिवानुभव मंडपशेजारी असलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळेतील कीचनमधील सुमारे सात हजार रुपयांची स्वयंपाकाची भांडी रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरीला नेली आहेतया प्रकरणी जत पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. शाळेच्या पोषण आहाराची चार मोठी पातेली,त्याची चार झाकणे,लहान दोन पातेली,झारी,चमचे,फिल्टर भांडी,पाच लिटरचा कूकर,हळदपूड,चटणी,तेल असा सुमारे सात हजाराचा ऐवज लूटून नेला आहे.रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कीचनशेडच्या दरवाजाचे कुलूप तोडून हा ऐवज नेला आहे.याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.

सांगली जिल्ह्यात केवळ दीड टक्के एचआयव्ही रुग्ण
जत,(प्रतिनिधी)-
प्रसारमाध्यमांमधील जाहिराती,पथनाट्ये,ग्रामस्तरावरील समुपदेशक यामुळे एचआयव्ही संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली असून गेल्यावर्षी तपासणी केलेल्या रुग्णांमधील फक्त दीड टक्के रुग्णांना बाधा झाली असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा एड्स नियंत्रक विवेक सावंत यांनी जत येथील शिक्षकांच्या एड्स जनजागृती कार्यशाळेत बोलताना दिली.
जत येथील रामराव विद्यामंदिर येथे एड्स जनजागृती  कार्यशाळा पार पडली. यावेळी श्री.सावंत बोलत होते. ते म्हाणालेसांगली जिल्ह्यात 2004 मध्ये चाचणी केलेल्या रुग्णांपैकी 24 टक्के रुग्णांना एड्सची लागण झाली होती.2006 पर्यंत त्यात वाढ होत होती,मात्र त्यानंतर जनजागृतीमुळे एचआयव्ही बाधीत रुग्णांची संख्या कमी कमी होत गेली.आजही एचआयव्ही बाधीत रुग्णांची संख्या मिरज आणि जत तालुक्यात सर्वाधिक आहे.सगळ्यात कमी प्रमाण कडेगाव तालुक्यात आहे. 2013 मध्ये तपासणी झालेल्या रुग्णांपैकी1243 जणांना एचआयव्ही झाला होता.त्यात सर्वाधिक 546 एवढे रुग्ण मिरज तालुक्यातील आहेत. त्यानंतर 270 जत तालुक्यात रुग्ण आढळून आले.

87 टक्के एड्स हा असुरक्षित संबंधांमुळे होतो,त्यामुळे जास्तीत जास्त जनजागृती एड्सवर नियंत्रण आवश्यक आहे. यासाठी शिक्षक,मुख्याध्यापक यांनी गावपातळीवर जनजागृती करावीअसे आवाहनही श्री सावंत यांनी केले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक शिक्षण विस्ताराधिकारी आर.डी.शिंदे यांनी तर आभार श्री.गेजगे यांनी मानले. यावेळी जत तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्यापक उपस्थित होते.

Wednesday, January 11, 2017

के.एम.हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न


जत,(प्रतिनिधी)-
जत येथील के.एम.हायस्कूल आणि ज्युनीअर कॉलेज तसेच शारदा विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला स्नेहसंमेलन मेळावा व वार्षिक क्रीडा स्पर्धा यांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्रमुख पाहुणे म्हणून जत पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सौ.वर्षा डोंगरे उपस्थित होत्या.
सलग तीन दिवस चाललेल्या क्रीडा स्पर्धांसह विविध कलागुणांना वाव देणार्‍या झालेल्या स्पर्धा आणि स्नेहसंमेलन मेळावा यांची सांगता या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाने झाली. यावेळी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पार पडले.तालुका,जिल्हा,राज्य आणि आंतरराज्य क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंबरोबरच शालेय स्तरावर हस्ताक्षर,वेशभुषा,निबंध,चित्रकला,वक्तृत्व,बौद्धिक अशा विविध स्पर्धांमध्ये क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी बक्षीस,पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक सौ.वर्षा डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले,कोणतीही गोष्ट आजची उद्यावर ढकलू नका.आजचे काम आजच करा. कष्ट करा,जिद्द बाळगा त्यामुळे तुम्हाला सहज यश मिळून जाईल. वाचन भरपूर करा, हे सांगतानाच त्यांनी आपला आवडीचा छंद जोपासा.कष्ट करण्याच्या दिवसात कष्ट करा. मोबाईल,संगणक आणि टीव्ही याचा अतिरेक टाळा. त्यागोष्टी आपल्यासाठी आहेत. त्याचे गुलाम होऊ नका,असे आवाहनही त्यांनी केले.प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीमती एम.डी.तवटे यांनी केले. सूत्रसंचालन विजय बिराजदार व सुरेखा हंकारे यांनी केले.आभार मुख्याध्यापक आर.एम. सय्यद यांनी मानले.यावेळी दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष धानाप्पा पट्टणशेट्टी,डॉ.मनोहर मोदी,डॉ.विजय पाटील,शिवलिंगापा संख,हिट्टी,चंद्रशेखर गोब्बी,माजी मुख्याध्यापक श्री.उदगिरे,कुंभार,बिराजदार सर,श्री.माचेट्टी,शारदा विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिंदे,सौ.सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

युवकांनी वरातीच्या पुढे नाचण्यापेक्षा शास्त्रीय नृत्यात प्राविण्य मिळवावे:यादव


जत,(प्रतिनिधी)-
युवकांनी वरातीच्या पुढे न नाचता एख्याद्या कलेत प्राविण्य मिळवून नावलौकीक मिळवा,असे आवाहन हास्यसम्राट संभाजी यादव(कोल्हापूर)यांनी जत येथील बसव व्याख्यानमालेत बोलताना केले.
जत येथील के.एम.हायस्कूल आणि ज्युनीअर कॉलेज व शारदा विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बसव व्याख्यानमालेचे दूसरे पुष्प गुंफताना केले.'हसण्यासाठी जगा व जगण्यासाठी हसा' याविषयावर बोलत होते. जग फार सुंदर आहे.त्याचा चांगला उपयोग करा.विविध कलांमध्ये प्राविण्य मिळवा.वरातीपुढे हिडिसपणे नाचन्यापेक्षा शास्त्रीय नृत्यात प्राविण्य मिळवा.त्यामुळे चांगला नावलौकीक मिळेल.चित्रपटात काम करणारे अमिताभ बच्चन काही वरातीपुढे नाचले नाहीत.जगताना हसत रहा.त्यामुळे ताणविरहित जीवन जगता येते. यावेळी त्यांनी विविध वाद्यांचे,नेते-अभिनेते यांचे तसेच प्राणी-पक्षी यांचे आवाज काढून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.विनोदी चुटके,प्रसंग सांगून हसवून सोडले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.एम.सय्यद यांनी केले.पाहुण्यांची ओळख डी.एम.माळी यांनी करून दिली.सूत्रसंचालन भूषण माने व बिराजदार यांनी केले.आभार श्रीमती एम.डी.तवटी यांनी मानले.यावेळी दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष धानाप्पा पट्टणशेट्टी,डॉ.मनोहर मोदी,माजी पं.स.माजी सभापती आर.के.पाटील,डॉ.विजय पाटील,शिवलिंगापा संख,हिट्टी,चंद्रशेखर गोब्बी,डॉ.अशोक मोगली,नगरसेवक परशुराम मोरे आदी उपस्थित होते.