Wednesday, May 26, 2021

हेही जरा ऐका...!


दीडशे कि.मी. वरून हिमालयाची शिखरे स्पष्ट दिसू लागली .. गंगा नदीचा तळ स्पष्ट दिसू लागला…

दहा पंधरा दिवस घरी शांत बसा, नाहीतर आकाशातून येताना यम सुद्धा स्पष्ट दिसायला लागेल…

@@@@@@@@@@@@@

जातं ओढायला सुध्दा ताकद लागते, पण जातं जास्त ताकद लावून ओढलं ना तर त्याचा खुंटा बाजूला निघून पडतो.

याचा अर्थ असा आहे की,आयुष्याचे दळण जर व्यवस्थित दळायचे असेल तर…

अंगातला अहंकार दूर करून नम्र व्हावं लागतं,तेव्हा आयुष्याचा खुंटा व्यवस्थित चालतो…!!

आज घरी राहिलात तर, उद्याचा दिवस तुमचाच असेल…

@@@@@@@@@@@@@@

एका बाईने डॉक्टरला विचारलं,

जेव्हा माझा नवरा बँकेमधुन घरी येतो तेव्हा मी त्यांना बुट आणि कपडे बाहेर काढायला सांगते, मग डेटॉलने पूर्ण शरीर स्वच्छ करते. मग त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालते मग गुळण्या करायला गरम पाणी आणि लिंबू देते. मग सॅनिटाईझरने हाथ पाय स्वच्छ करते… एवढं पुरेसे आहे का..?

डॉक्टर : जमले तर तुम्ही त्यांना कुकर मध्ये घालून तीन शिट्या घेऊ शकता.

Tuesday, May 25, 2021

व्हॉट्स अप


विनाकारण आपण व्हॉट्सअ‍ॅपला नावे ठेवतो. आपल्याला काय फायदे झालेत ते वाचा.

रोजचं चॅटिंग करता-करता छान टायपिंग करायला शिकलो. रोजचे सॉरी / थँक्सपासून, सर्व व्यवहार पाळायला शिकलो. आपलेच सेल्फी काढता-काढता चांगली छायाचित्रे काढायला पाहायला शिकलो.

नवनवीन मेसेज पाठवताना आपण थोडे वाचायलाही शिकलो. वेगवेगळ्या स्टीकरचा वापर करून…शब्दाविना भाव दाखवायला शिकलो. रोजचे सुविचार वाचून थोडं अध्यात्माकडेही नकळत झुकलो.

कधीकधी कॉमेंट करुन ‘मनमोकळे विचार‘ मांडायला शिकलो. कायम नेट पॅक मारत असताना अनावश्यक खर्चही करायला शिकलो. सुसंवाद वाढवत जाऊन नाती अधिकाधिक जपायलाही शिकलो. छान सुंदर विनोदी प्रसंग वाचून.. इमोजींसह हसायला व हसवायलाही शिकलो. चांगले सकारात्मक विचार दृष्टीत आले की, इतरांशी अशा विचारांची, देवाण घेवाण करणे शिकलो. घर बसल्या मनोरंजन होते आहे, विकासही होतो आहे..!!!

&&&&&&&&&&&&&&&&&&&

सांग सांग भोलानाथ

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? खूप वर्षांपासून चाललेल्या या कवितेला शेवटी यश आलं! आमचं बालपणापासूनच स्वप्न पूर्ण झालं!

&&&&&&&&&&&&&&&&&&&&

सावित्रीने सत्यवानाला यमाकडून परत आणले यावरून काय बोध घ्यायचा ? यम आणि मृत्यूदेखील तुम्हाला तुमच्या बायकोपासून वाचवू शकत नाही. तेव्हा शांत रहा, बायकोवर प्रेम करा. कारण दुसरा उपाय नाही!


Monday, May 24, 2021

नव्या म्हणी… तेवढ्याच उद्बोधक

 


हंड्यावर हंडे सात, त्यावर मांडली परात,

कोरोनाला हरवायला, बसा आपापल्या घरात

मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर,

सगळ्यानी मास्क घालूनच पडा घराबाहेर,

शंकराच्या पिंडीवर बेलाच पान ठेवते वाकून,

रोजचे व्यवहार करा सोशलडिस्टंसिंग राखून

शिरा बनवायला तूप, साखर, वेलची व रवा आणला जाडा,

रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला प्या आयुर्वेदिक काढा

ताजमहाल, कुतुबमिनार बनवणारे कारागीर होते ग्रेट,

लक्षण दिसली कोरोनाची तर डॉक्टरना भेटा थेट

काळे मणी, सोनेरी मणी घरभर पसरले,

कोरोनामुळे सगळे इतर आजार विसरले

चिमणीला म्हणतात चिऊ, कावळ्याला म्हणतात काऊ,

आपण घरीच सुरक्षित राहू, विनाकारण बाहेर नका जाऊ,

चांदीच्या ताटात ठेवले सफरचंदाचे काप,

डॉक्टरांना त्वरित भेटा आला जरी ताप, 

काळजी घ्या, सुरक्षित राहा…

*************************************

वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो… गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशिरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो… तसेच चांगले विचार समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही… म्हणून जीवनात गवतासारख्या भेटणार्‍या लोकांपेक्षा वटवृक्षासारख्या खंबीर असणार्‍या लोकांच्या सानिध्यात राहावे

**************************************

स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो. कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते, म्हणूनच स्वभावसुद्धा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे…

****************************************

जेव्हा नखं वाढतात तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो. नखं वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही… त्याचप्रमाणे, जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा, तुमच्यातल्या नात्याला कापू नका… ‘विश्वास’ एखाद्यावर इतका करा की, तुम्हाला ‘फसवताना’ तो स्वत:ला ‘दोषी’ समजेल…

सांगलीचा एव्हरेस्ट वीर संभाजी गुरव


मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक पडवळवाडी (ता. वाळवा) येथील संभाजी गुरव  यांनी जगातील सर्वांत उंच असलेले एव्हरेस्ट शिखर सर करून महाराष्ट्र पोलिस दलाचा झेंडा फडकावला. त्यांच्या या कामगिरीने वाळवा तालुक्‍याचे नाव गिर्यारोहकांच्या यादीत नोंदवले गेले आहे. गुरव यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याची घोषणा संबंधित कंपनीने आपल्या वेबसाईटवर केली आहे.

गुरव मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत. एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलाचे ते तिसरे कर्मचारी ठरलेत. गुरव यांना पोलिस दलात भरती होण्यापूर्वी गिर्यारोहणाची आवड होती. ती त्यांनी पोलिस दलात भरती झाल्यानंतरही जोपासली. त्यांनी यापूर्वी आपली शारीरिक क्षमता तपासणीसाठी एव्हरेस्ट बेसकॅम्प प्रशिक्षण  पूर्ण केले होते. त्यानंतर एव्हरेस्ट सर करणारच, असे ध्येय उराशी बाळगून त्यांनी गेली दोन वर्षे अथक परिश्रम केले. एव्हरेस्ट शिखर सर केल्याने त्यांच्या परिश्रमाचे चीज झाले आहे. उणे १९ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असलेल्या एव्हरेस्ट शिखरावर त्यांनी काठमांडू  येथून चढाई करण्यास सुरुवात केली. एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ६५ किलोमीटरचा टप्पा त्यांनी पूर्ण करत १७ मे रोजी बेस कॅम्प २ पर्यंत, १८ मे रोजी बेसकॅम्प ३, १९ मे रोजी बेस कॅम्प ४ आणि २० मे रोजी तेथून एव्हरेस्ट शिखराची चढाई सुरू केली. २१ मेपर्यंत निसर्गाची साथ राहिली, तर एव्हरेस्ट सर करता येईल, अशी आशा होती. वातावरण आणि निसर्गाने साथ दिल्याने शनिवारी (ता. २२) रोजी त्यांनी एव्हरेस्ट शिखरावर आपले पाय रोवले. त्यांच्या या कामगिरीने वाळवा तालुक्‍यासह सांगली जिल्ह्याचे नाव गिर्यारोहकांच्या यादीत सुवर्ण अक्षरांनी नोंदवले गेले आहेच. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

स्वप्न पूर्ण झाले संभाजी गुरव हे वाळवा गावाशेजारील पडवळवाडीचे रहिवासी आहेत. ते सामान्य कुटुंबात जन्मले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ते पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षकपदी भरती झाले. त्यांनी यापूर्वी गडचिरोली येथे पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. व्यायाम आणि शारीरिक क्षमता राखण्यावर त्यांचा कायम भर असे. एक दिवस जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करायचे हे त्यांचे स्वप्न होते. ते अनेक वेळा बोलूनही दाखवत. ते कायम व्यायाम व त्यासाठी लागणारी शारीरिक क्षमता निर्माण करण्यासाठी धडपडत होते. ८८४८ मीटर उंच एव्हरेस्टवर चढाई करताना त्यांना अनंत अडचणी व बर्फवृष्टीचा सामना करावा लागला; पण त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून एव्हरेस्टवीर हा मानाचा किताब पटकावला.

तिसरे पोलिस कर्मचारीयापूर्वी महाराष्ट्र पोलिस दलातील आयपीएस सुहेल शर्मा, औरंगाबाद येथील पोलिस कर्मचारी रफीक शेख यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. त्यांच्यानंतर संभाजी गुरव हे शिखर सर करणारे तिसरे कर्मचारी ठरले आहेत. दरम्यान सांगली शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील कस्तुरी याही आता एव्हरेस्ट शिखराजवळ पोहोचल्याची बातमी आली आहे. कॅम्पच्या तीनच्या दिशेने चढाई करत आहेत. करवीरकन्या कस्तुरी सावेकरची एव्हरेस्टची अंतिम चढाई सुरू झाली असून बुधवारी (२६) पहाटे ती एव्हरेस्टवर तिरंगा फडकवण्याची शक्यता आहे. एकूणच कोल्हापूरसाठी ही अभिमानाची गोष्ट असून, आज ती कॅम्प दोनवर होती. उद्या (सोमवारी) पहाटे ती कॅम्प तीनच्या दिशेने चढाईला प्रारंभ करणार आहे.

कस्तुरीच्या टीममध्ये एकूण बारा गिर्यारोहकांचा समावेश आहे. ही सर्व टीम सुखरूप असून मंगळवारी (२५) पहाटे कॅम्प चारच्या दिशेने त्यांची चढाई सुरू होईल आणि बुधवारी पहाटे एव्हरेस्टचा शिखर माथा ती गाठेल आणि एव्हरेस्टवर कोल्हापूरचा झेंडा रोवेल, असे आज तिचे वडील दीपक सावेकर यांनी सांगितले. दरम्यान, कस्तुरी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून इतक्या मोठ्या मोहिमेसाठी गेली असून, तिला अनेक सेवाभावी व्यक्ती, संस्था, संघटनांनी आर्थिक बळ दिले आहे. मात्र, तरीही निधी कमी पडला असल्याने मालोजीराजे छत्रपती यांनी तत्काळ पन्नास हजारांची आर्थिक मदत कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांच्याकडे दिली. यावेळी मधुरिमाराजे छत्रपती, उद्योजक तेज घाटगे, जय कामत, यशराजराजे छत्रपती आदी उपस्थित होते.

Friday, December 4, 2020

भांगेला औषध म्हणून संयुक्त राष्ट्राची मान्यता


हजारो वर्षांपासून भांगेचा वापर हा मादक पदार्थ आणि औषध म्हणून करण्यात येतो. फक्त भारतीय उपखंडच नव्हे तर जगभरात भांगेचा असा वापर करण्यात येतो. आता संयुक्त राष्ट्र संघाने भांगेचा वापर औषध म्हणून करण्यास मान्यता दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या अंमली पदार्थ आयोगाने भांगेला अंमली पदार्थाच्या यादीतून वगळले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने औषध म्हणून मान्यता दिली असली तरी वैद्यकीय कारण वगळून इतर कारणांसाठी त्याचा वापर करण्यास बंदी आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंमली पदार्थाच्या यादीतून भांगेला वगळण्याबाबत मतदान झाले. यावेळी २७ सदस्य देशांनी प्रस्तावाच्या बाजूने आणि २५ सदस्यांनी प्रस्तावाविरोधात मतदान केले. या ऐतिहासिक मतदानात अमेरिका आणि ब्रिटनने यादीतील बदलाच्या बाजूने मतदान केले. तर, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नायजेरिया, रशिया आदी देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. संयुक्त राष्ट्राच्या मान्यतेनंतर भांगेपासून तयार करण्यात आलेल्या औषधांची मागणी असणार्‍या देशांचा फायदा होणार आहे. त्याशिवाय भांगेच्या औषधी गुणधर्माबाबत अधिक संशोधन होण्याची शक्यता आहे.

भारतात हजारो वर्षांपासून भांगेचा वापर करण्यात येतो. धार्मिक कर्मकांडातही त्याचा वापर करण्यात येतो. चीन आणि इजिप्तमध्येही भांगेचा वापर हजारो वर्षांपासून औषध म्हणूनच करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने मान्यता दिल्यामुळे आता अनेक देशांना भांगेचा वापर औषध म्हणून करता येणार आहे. जगभरातील ५0 हून अधिक देशांमध्ये भांगेचा वापर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कॅनडा, उरुग्वे आणि अमेरिकेतील १५ राज्यांमध्ये भांगेचा औषधी वापर करण्यास परवानगी आहे.

संयुक्त राष्ट्र संघाकडून भांगेला मान्यता मिळणे ही मोठी बाब असल्याचे एका स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे. भांगेचा वापर अनेकजण औषध म्हणून करतात. भांगेपासून तयार करण्यात आलेल्या औषधांची विक्रीही वाढली आहे. औषध म्हणून भांगेला मान्यता देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. भांगेवर बंदी घालण्याचा निर्णय हा वसाहतवादी विचारांचा परिणाम असल्याचे एनजीओने म्हटले आहे. भांगेवर बंदी असल्यामुळे जगभरातील अनेकजणांना दोषी असल्याचे समजण्यात येत होते.

Wednesday, December 2, 2020

फ्लॉवरचे औषधी गुणधर्म


आपल्या रोजच्या आहारात विविध भाज्यांचा समावेश असतो. शिवाय ऋतूमानानुसार विशिष्ट भाज्या उपलब्ध असतात. मात्र, त्यांचं आरोग्यदृष्ट्या महत्त्व लक्षात घ्यायला हवं. त्यादृष्टीने आज फ्लॉवरचे गुणधर्म जाणून घेऊ. फ्लॉवर चविष्ट आहे शिवाय अनेक उपयुक्त गुणधर्मांनी युक्त आहे. आदिवासी जमातींच्या आहारातही या भाजीला महत्त्व दिलेलं दिसतं. फ्लॉवरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिनं, कबरेदकं, लोह, अ, ब, क ही जीवनसत्त्वं, आयोडिन, पोटॅशियम आणि काही प्रमाणात तांबं असे पोषक घटक असतात. त्याचं सेवन गुणकारी ठरतं. हिरड्यांमधून रक्त येत असेल तर फ्लॉवरच्या पानांचा रस प्रभावी ठरतो. कच्चा फ्लॉवर खाल्ला तर हिरड्यांवरची सूज कमी होते. दररोज रिकाम्या पोटी फ्लॉवरचा रस प्यायला तर कोलायटीस आणि पोटाचे इतर विकार दूर होतात. गळ्याला सूज आली असेल तर फ्लॉवरच्या पानांचा रस गुणकारी ठरतो. गळ्याच्या इतर विकारांवरही हा रस प्रभावी आहे. कच्चा फ्लॉवर स्वच्छ धुवून चावून खावा. यामुळे रक्त शुद्ध होतं आणि त्वचाविकार दूर होतात. भरपूर प्रमाणात लोह, प्रथिनं असल्याने शरीराला भरपूर उर्जा मिळते. रात्री झोपण्यापूर्वी फ्लॉवरचा रस प्यायल्यास बद्धकोष्ठतेच्या तक्रारी दूर होतात आणि पोट साफ होऊन जाते.

एड्सला ४0 वर्षे लोटले तरी अद्याप लस नाही


सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-

एड्स या रोगाला ४0 वर्षे लोटल्यांतरही अद्याप लस मिळालेली नाही. कोणत्याही महामारीवर रामबाण औषध तयार करणे एवढे सोपे नसते, हा दावा वैज्ञानिकांनी आधीच केला आहे. यासाठी काही वर्षे लागू शकतात किंवा कधीच औषध सापडत नाही. असाच काहीचा प्रकार एड्सबाबत झाला आहे.
एड्सबाबत ३ डिसेंबर १९८0 रोजी वैज्ञानिकांना पहिल्यांदा समजले होते. एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठी किंवा हा रोग झालेल्या रुग्णाला बरे करण्यासाठी आजपर्यंत एकही औषध तयार झालेले नाही. हा आजार कोरोनाप्रमाणे एवढा खतरनाक नसला तरी लैंगिक संबंधांमुळे होत असल्याने तेवढाच बदनाम आहे. एड्स झालेल्याची सुई किंवा तत्सम टोचलेली वस्तू जर अन्य कोणाला लागल्यास त्यालाही एड्स होण्यीच शक्यता असते. शिवाय शारीरिक संबंध ठेवल्यावरही एड्स पसरण्याची शक्यता असते. एवढा मोठा रोग असूनही यावर जगभरातील रथी महारथी संशोधकांना यावर लस शोधता आली नाही.
एवढे असले तरीही एड्सबाबत जनजागृती आणि काळजी घेतल्याने हा रोग कमालीचा नियंत्रणात आला आहे.
एड्सबाबत ५ डिसेंबर १९८४ रोजी पहिल्यांदा माहिती मिळाली होती. यावर दोन वर्षांच्या आत एड्सवर औषध बनविण्यात येईल, असा दावा अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवा विभागाने छातीठोकपणे केला होता. मात्र, जंग जंग पछाडूनही शास्त्रज्ञांना काही औषध सापडले नव्हते. मानवी शरीरात रोगांशी लढणारी प्रतिकारशक्ती एड्स व्हायरसच्या विरोधात कामच करत नाही. हा रोग ज्याला होतो, त्याच्या शरीरात अँटीबॉडी तयार होते. मात्र ती केवळ या व्हायरसच्या शरीरातील प्रसाराचा वेग कमी करते, रोखत नाही. यामुळे एचआयव्ही झालेल्या रुग्णाला बरे करणे जवळपास अशक्य आहे.
एड्स हा कोरोना एवढा वेगवान रोग नाही. त्याची शरीरामध्ये पसरण्याचा वेग हा काही वर्षांचा असतो. या काळात हा व्हायरस मानसाच्या डीएनएमध्ये लपून राहतो. यामुळे या व्हायरसला शोधून नष्ट करणे खूप कठीण काम आहे.
अधिकाधिक लसी या अशा व्हायरसपासून सुरक्षा करतात जे शरीरामध्ये श्‍वासोच्छवासाद्वारे किंवा गैस्ट्रो-इंटसटाइनल सिस्टमद्वारे दाखल होतात. तर एचआयव्हीचे संक्रमण गुप्तांग किंवा रक्ताद्वारे होते. जनावरांवर व्हायरस आणि लसीची चाचणी केल्यानंतर माणसांसाठी औषध बनविले जाते. मात्र, दुर्भाग्य म्हणजे एचआयव्हीसाठी असे काहीच यश आलेले नाही. फक्त एकच जमेची बाजू म्हणजे कोरोना एड्ससारखा डीएनएमध्ये लपत नाही. यामुळे तो शोधला जाऊ शकतो.