Thursday, August 24, 2023

जादूटोणाविरोधी विधेयक’ मंजूर करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

सांगली,(प्रतिनिधी):

 नरबळी, भूत उतरवणे, पैशांचा पाऊस, गुप्तधन, नग्नपूजा अशाप्रकारची बुवाबाजी करणाऱ्यांविरोधात राज्यात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गेल्या दहा वर्षांत हजारांपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यामधील दहा गुन्ह्यांत भोंदूबाबांना शिक्षा झाली आहे.

अनेक खटले न्यायालयात सुरू आहेत. विशेष म्हणजे तक्रारदारांमध्ये लैंगिक शोषण झालेल्या महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. 

या कायद्याबाबत शासनपातळीवरून पुरेशा प्रमाणात जनजागृतीची जरुरी आहे.‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर २६ ऑगस्ट २०१३ रोजी तत्कालीन राज्य सरकारने ‘जादूटोणाविरोधी विधेयक’ मंजूर केले. अशाप्रकारे कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनले असून त्यानंतर कर्नाटकमध्ये हा कायदा झाला.या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘अंनिस’ विविधस्तरांवर प्रयत्न करीत आहे. नरबळी देणे अथवा देण्याचा प्रयत्न करणे, करणी, भानामती, जादूटोणा, भूत उतरविण्याच्या बहाण्याने अंगाला चटका देणे, जबरदस्तीने मानवी विष्ठा तोंडात कोंबणे, मारहाण करणे, चमत्काराचा दावा करून महिलांचे लैंगिक शोषण करणे, गुप्तधन काढण्याच्या बहाण्याने अघोरी प्रथांचा अवलंब करणे, दैवी शक्तीचा दावा करून महिलांना विवस्त्र पूजेस बसण्यास जबरदस्ती करणे, डाकीण समजून त्रास देणे, पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने फसवणूक करणे आदी घटनांमध्ये जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले आहेत.

गेल्या दहा वर्षांत एक हजारांवर भोंदूबाबा बुवांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये सर्व धर्मातील भोंदूबाबांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. जादूटोणाविरोधी कायदा देशपातळीवर लागू करा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.‘कायद्याचे नियम करा’महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर सरकारने जादूटोणाविरोधी कायदा महाराष्ट्रात लागू केला, तरी या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोणत्याही सरकारला नियम करण्यासाठी वेळ मिळाला नाही. जादूटोणाविरोधी कायद्याचे नियम तातडीने तयार करावेत, अशी मागणीही डॉ. दाभोलकर यांनी केली.

म्हैसाळ येथील नऊ जणांचे हत्याकांड, सातारा येथील गुप्तधनाच्या लालसेमधून देण्यात आलेला नरबळी, पुण्यात गुप्तधनासाठी बळी देण्याचा झालेला प्रयत्न, नागपूरमधील पाच वर्षांच्या बालकाचा भुताने झपाटले म्हणून नातेवाइकांच्या मारहाणीत झालेला मृत्यू, पुण्यात उद्योजकाने व्यवसायात यश आणि पुत्रप्राप्तीसाठी सर्वांसमक्ष पत्नीला स्नान घातले होते.वर्ध्यात युवतीला विवस्त्र करून पैशाचा पाऊस पाडण्याचा प्रकार घडला होता, बीडमध्ये म्हशीवर करणी केल्याच्या संशयावरून चिमुकल्याचा बळी देण्यात आला होता, पंढरपूरला लोमटे महाराजाकडून महिलांवर अत्याचार करण्यात आला होता.मुंबईत वकील महिलेवर पतीसमोरच मांत्रिकाने केलेला बलात्कार, पुण्यात संगणक अभियंता महिलेला मूल होण्यासाठी स्मशानातील राख आणि हाडांची भुकटी खाण्याची बळजबरी आदी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना उघड झाल्या आहेत.

Wednesday, August 2, 2023

विकसित देशांमध्ये मद्यपानाचा कल झाला कमी , आकडेवारी देतेय याची साक्ष

भारत मात्र सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ

नवी दिल्ली : विकसित देशांमध्ये दारूचे सेवन कमी होत असताना भारतासारख्या देशांत मात्र त्याचे सेवन वाढत आहे.विकसित देशांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये दारू पिण्याचे प्रमाणही कमी होत आहे. जर्मनी, कॅनडा, युरोपमधील आकडेवारी याची साक्ष देत आहे की येथे दारू पिणे ही आता महत्त्वाची गोष्ट राहिलेली नाही. दारूला आरोग्या बरोबरच सोशल स्टेटसविरुद्धदेखील मानले जात आहे. 

जर्मन सेंटर फॉर हेल्थ एज्युकेशन 2004 पासून मद्यपानावर सर्वेक्षण करत आहे. कमीत कमी पाच पेये सेवन करणे याला बिंज ड्रिंकिंग (द्विशतक पेय) म्हणतात.सर्वेक्षणानुसार 12 ते 25 वर्षे वयोगटातील दारूचे सेवन कमी होत आहे.2004 मध्ये, जिथे 12 ते 17 वर्षे वयोगटातील 21 टक्के लोक एकदाच जास्त मद्यपान करत होते, 2021 मध्ये हा आकडा 9 टक्क्यांवर घसरला. 18 ते 25 वयोगटातील तरुणांमध्येदेखील हाच प्रकार दिसून आला. 

 युरोपमधील सर्वाधिक मद्यपान करणाऱ्या देशांमध्ये जर्मनीचे नाव घेतले जाते. पण इथे जानेवारी ते जून २०२३ पर्यंत बिअरचा वापर २.९ टक्क्यांनी घसरून ४.२ अब्ज लिटरवर आला. यामध्येही घरगुती बिअरच्या वापरात ३.५ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली असून, एकूण वापराच्या ८२ टक्के वाटा आहे. निर्यातीतही 0.4 टक्क्यांची घसरण झाली आहे.  गेल्या 10 वर्षात ही घट 12.2 इतकी आहे. 

याआधी, मार्च 2023 मध्ये, कॅनेडियन डेटाने हे देखील उघड केले होते की एका दशकात येथे दारूचे सेवन 1.2 टक्क्यांनी कमी झाले आहे. जी 1949 नंतरची सर्वात मोठी घसरण आहे. वाईनच्या वापरामध्ये सर्वाधिक घट ४ टक्के नोंदवली गेली.  गेल्या दशकापूर्वीच्या तुलनेत येथेही बिअर मार्केट 8.8% ने कमी झाले आहे.  त्यांच्या मार्केट शेअरची भरपाई फ्रूट ज्यूस बिअर श्रेणीने केली आहे. 

भारत: सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ

युरोप आणि पाश्चिमात्य देशांमध्ये कमी प्रमाणात मद्यपान करण्याचा ट्रेंड असताना, भारत हा अल्कोहोलयुक्त पेयांसाठी सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. स्टॅटिस्टाच्या अभ्यासानुसार, २०२२ ते २५ दरम्यान भारतातील अल्कोहोलिक शीतपेयांची बाजारपेठ ८.८६ टक्के दराने वाढेल.